![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhY6uphZHnLr7Dg6YMQHHUVRm4b49QAXU35TzhrCCwD8oaMaVb0TFqLehcL4-TisjhUv3ksY7-YkLYkJhSwbYzkbsGykLhefc_-EsPpq3nmT662bAW-Pzs5NWqLDUlC7NOv_tCboju_iLvYHE12JtfqoWYwuaFUvKWBtgTRJzDjJHEbJM2Ro_0CdvcvhkU/w400-h250/KCR-1.jpg)
(२४ जून २०२३)
नागपूर : तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या लोकप्रिय योजनांची शिदोरी घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात उतरलेले भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेली विदर्भाची भूमी राजकीयदृष्ट्या सूपीक असली तरी सध्या त्यांच्याकडे झालेली जनाधार नसलेल्या नेत्यांची गर्दी लक्षात घेता ते या भागात मत पेरणीतून राजकीय लाभ पदरी पाडून घेऊ शकतात की फक्त पुन्हा एक नवी बी टीम म्हणून नावारुपास येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विरोधक या पक्षाला भाजपची ‘बी टीम’ म्हणत असले तरी या पक्षामुळे होणारी मत विभागणी विदर्भात जशी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरणार आहे तशीच ती बहुजनांच्या मोठ्या वर्गाचा पाठिंबा असलेल्या भाजपसाठीसुद्धा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. यावेळी राव यानी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढणार, असे जाहीर केले. कधीकाळी शेतकरी आंदोलनामुळे शेतकरी संघटनेचा प्रभाव असलेल्या विदर्भाकडे शेतकरी केंद्रित बीआरएसचे सर्वाधिक लक्ष असणार आहे. या भागात प्राबल्य असलेल्या कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांपैकी बीआरएस कोणाच्या मतांवर डल्ला मारणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.